पंचकर्माची ओळख – भाग १०: रक्तमोक्षण
आजच्या लेखात आपण पंचकर्मातील पाचव्या आणि महत्त्वाच्या उपचारपद्धतीवर चर्चा करू – ती म्हणजे रक्तमोक्षण.
रक्तमोक्षण म्हणजे दूषित रक्त शरीरातून बाहेर काढण्याची प्रक्रिया होय. आयुर्वेदात ही पद्धत मुख्यतः रक्तधातू शुद्धीकरिता वापरली जाते.
रक्तमोक्षणाचे महत्त्व
आयुर्वेदानुसार शरीरात वात, पित्त, कफ या त्रिदोषांबरोबरच सात धातू कार्यरत असतात – रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र. यापैकी रक्त हा दुसरा धातू असून, शरीरात पोषणाची प्रमुख जबाबदारी पार पाडतो.
जेव्हा शरीरात निर्माण झालेले दोष विविध उपचारांनी कमी होत नाहीत, तेव्हा रक्तमोक्षण हे प्रभावी ठरते. ही उपचारपद्धती त्वरीत परिणाम देणारी आणि काही वेळा इमर्जन्सी ट्रीटमेंट म्हणूनही उपयोगी ठरते.
रक्तदुष्टीची कारणे
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे रक्तदुष्टी मोठ्या प्रमाणावर आढळते. यामागील काही प्रमुख कारणे:
1. अति मसालेदार अन्न, तिखट पदार्थ, चहा, बेकरी उत्पादनांचे जास्त सेवन.
2. विरुद्ध आहार, शिळे किंवा फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न.
3. अति श्रम, प्रवास, मानसिक ताणतणाव, राग किंवा चिंता.
4. शरद ऋतू किंवा तरुण वयात रक्तदुष्टी होण्याची शक्यता जास्त असते.
रक्तमोक्षणाचा उपयोग होणारे विकार
रक्तदुष्टीमुळे अनेक विकार उद्भवू शकतात, जसे:
· त्वचारोग: तारुण्यपिटिका, गळवे, चेहऱ्यावरचे डाग, सोरियासिस, एक्झिमा.
· यकृत व प्लीहेचे रोग: लिव्हरचे आजार, गाठी, विशिष्ट कॅन्सर.
· सामान्य त्रास: चक्कर येणे, तोंड येणे, अॅलर्जी, मूळव्याध.
रक्तमोक्षण पद्धती
आयुर्वेदात रक्तमोक्षण करण्याच्या दोन प्रकारांचा उल्लेख आहे:
1. सार्वदेहिक रक्तमोक्षण
o सिरींज व नीडलद्वारे शिरेतून रक्त काढले जाते.
o 100-300 ml दूषित रक्त काढून टाकले जाते.
2. स्थानिक रक्तमोक्षण
o जलौकावचारण (जळवा लावणे), प्रच्छान (फासण्या मारणे), श्रुंग, अलाबू यांच्या साहाय्याने स्थानिक भागातून रक्त काढले जाते.
जलौकावचारण (जळवा लावणे)
जळवा नैसर्गिकरीत्या दूषित रक्त शोषून घेतात. त्यांचा लाळेमध्ये हिरुडिन असल्यामुळे रक्त गोठत नाही. व्हेरीकोज व्हेन्स, मुळव्याध, त्वचारोग, तारुण्यपिटिका अशा विकारांवर हा उपचार प्रभावी ठरतो.
प्रच्छान कर्म (फासण्या मारणे)
अतिशय वरच्या स्तरावरचे दोष असताना, त्वचेवर लहान छेद घेऊन रक्तमोक्षण केले जाते.
अलाबू व श्रुंग
जुन्या काळात भोपळा किंवा शिंगाचा वापर करून दूषित रक्त काढले जाई. सध्याच्या काळात आधुनिक साधनांचा उपयोग करून अशा प्रक्रियांना अधिक सुलभ केले गेले आहे.
रक्तमोक्षणासाठी खबरदारी
1. पूर्वतयारी: रुग्णाची प्रकृती, वय, बल, ऋतू, व्याधी यांचा विचार करून निर्णय घेतला जातो.
2. पश्चात् काळजी: रक्तमोक्षणानंतर 15 दिवस ते 1 महिना श्रम, प्रवास, विरुद्ध आहार वर्ज्य असतो.
नवीन काळातील रक्तमोक्षण
आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि आयुर्वेदिक ज्ञान यांच्या संगमामुळे रक्तमोक्षण आता अधिक प्रभावी झाले आहे. पंचकर्मातील ही प्राचीन प्रक्रिया आजही तितकीच उपयुक्त आणि परिणामकारक ठरते.
पुढील भागात: शिरोधारा, जानुबस्ती, कटीबस्ती, नेत्रतर्पण यांसारख्या उपकर्मांची माहिती.
डॉ. भूषण काळे डॉ .स्मिता काळे
एम एस (प्रसूती व स्त्री रोग ) एम डी (पंचकर्म ) केरळ
आयुभूषण आयुर्वेदिक वंध्यत्व निवारण आणि केरळीय पंचकर्म चिकित्सालय
(वंध्यत्व, स्त्रीरोग, गर्भसंस्कार, सुवर्णप्राशन, केरळीय पंचकर्म)
No comments:
Post a Comment